उदगीर (एल.पी.उगीले)
शहराच्या लगत असलेल्या अवघ्या १०० मीटर अंतरावर असणाऱ्या भगीरथ राजा नगर ते कमलेश्वर माध्यमिक व प्राथमिक विद्यालयाला जाणाऱ्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. परिणामी प्रभागातील नागरिकांना अवकाळी पावसाचा एखादा सडा का आला तरी त्या रस्त्यावरून चालणे कठीण होऊन जाते, इतर वेळाही कसरत करत चालावे लागते हा मनस्ताप सहन करावा लागत आहे. याबाबत उदगीर नगरपरिषद प्रशासनास व शासनास निवेदन सादर करूनही रस्त्याची बिकट अवस्था गेल्या 20-22 वर्षापासून कायम आहे.
शहरालगत व नगरपरिषद हद्दीत असणारे राजा भगीरथ नगर, धोंड कॉलनी, जळकोट रोड स्थित कमलेश्वर कन्या माध्यमिक व प्राथमिक विद्यालय अवघ्या अर्धा किलोमीटर अंतरावर हा प्रभाग वसलेले आहे. उदगीर-नांदेड मार्गावरून शहरालगत राज्य मार्ग प्रभागात जाण्यासाठी १०० मीटर अंतर पार करावे लागते. या अर्धा किलोमीटर अंतरावरील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दयनीय अवस्था झाली आहे. हा रस्ता आहे की नाही? कळायला मार्ग नाही. गत वर्षात भगीरथ राजा नगर, धोंड कॉलनी ते कमलेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय कडे येणाऱ्या अवघ्या अर्धा किलोमीटर अंतरावर रस्ता करावा व विद्यार्थ्यांसह लहान बालकांची चिखलातून पायपीट कमी व्हावी, अशी मागणी असतानाही अर्धा ते एक किलोमीटर अंतराचा रस्ता कसरत करत पायी चालून पार करण्यासाठी किमान २० मिनिटे लागतात, काहीशी तशीच अवस्था सायकल स्वार आणि दुचाकी स्वरांची देखील होत असते. यावरून रस्त्याची स्थिती सर्वसामान्यांना कळून येईल. रस्त्यावर दगड उखडून वर आले आहेत. यामुळे दोन चाकी वाहन तरी काय, पायी चालताही येत नाही. पायी चालतानाही तारेवरची कसरत करावी लागते. परिणामी प्रभागातील गल्लीत अति गंभीर रुग्णास हॉस्पिटलला घेऊन जाण्याकरिता वाहनही भगीरथ राजा नगर, धोंड कॉलनीत यायला तयार होत नाही. प्रभागात ऑटो चालक येतही नाहीत. रस्ताच पूर्णपणे उघडला असून जागोजागी पडलेले खड्डे, पायपीट करणाऱ्या प्रभागातील जेष्ठ नागरिक, वयोवृद्ध, लहान बालके, महिला, पुरुष, विद्यार्थी, विद्यार्थिनी व प्रभागात राहणारी जनता त्रस्त झाली आहे. गेल्या दीड वर्षापासून तर प्रशासकीय कार्यकाळ असल्याने कोण कोणाला विचारावे? असाच जणू प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासनाच्या दारी तर निवेदनांचा ढीग लागला आहे, परंतु प्रत्यक्ष कारवाई काहीच नाही, अशी अवस्था आहे. विकासाच्या मोठमोठ्या गप्पा होत असताना शहरालगतच्या प्रभागात अशा पद्धतीचा त्रास सहन करावा लागत असल्यामुळे नागरिक वैतागले आहेत.
