कै. बापूसाहेब पाटील एकंबेकर महाविद्यालय, उदगीर यांच्या वतीने, नॉलेज ब्रिज, शेवगाव तसेच एज्युटेक कार्पोरेशन, अहिल्यानगर यांच्या सहकार्याने “E-Content Development and Use of AI for Effective Teaching and Learning” या विषयावर दोन दिवसीय बहुविद्याशाखीय कार्यशाळेचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
याप्रसंगी व्यासपीठावरती कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.विजयकुमार पाटील,कार्यशाळेचे उद्घाटक डॉ.एल.एच. पाटील, संस्थेच्या कोषाध्यक्षा श्रीमती मृदुलाताई पाटील, प्रमुख पाहुण्या सुधा कुलकर्णी ,प्रमुख मार्गदर्शक श्री भूषण कुलकर्णी यांची उपस्थिती होती.
या कार्यशाळेचे उद्घाटन डॉ. एल. एच. पाटील (अध्यक्ष अर्थशास्त्र अभ्यास मंडळ,स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड) यांच्या शुभहस्ते
दीपप्रज्वलन करून करण्यात आले. उद्घाटन पर भाषणात डॉ.एल. एच.पाटील यांनी आधुनिक शिक्षण व्यवस्थेत ई-कंटेंट निर्मितीचे महत्त्व अधोरेखित करताना कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) ही शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवणारे तंत्रज्ञान असल्याचे सांगितले. शिक्षकांनी डिजिटल साधनांचा प्रभावी वापर करून अध्यापन अधिक सुलभ,आकर्षक व परिणामकारक करावे असे आव्हान त्यांनी केले. संस्थेच्या कोषाध्यक्षा श्रीमती मृदुला ताई पाटील यांनी शिक्षकांनी सतत नवे ज्ञान आत्मसात करून विद्यार्थ्यांना अद्ययावत शिक्षण देणे आवश्यक असल्याचे सांगितले.
साधन व्यक्ती श्री भूषण कुलकर्णी यांनी AI आधारित विविध साधनांचे प्रात्यक्षिक सादर करून ई-कंटेंट तयार करण्याच्या प्रभावी पद्धती स्पष्ट केल्या.
अध्यक्षीय भाषणात डॉ. विजयकुमार पाटील यांनी शिक्षण क्षेत्रात होत असलेल्या तांत्रिक बदलांची गरज अधोरेखित केली.पारंपारिक अध्यापन पद्धती सोबत आधुनिक तंत्रज्ञानाचा संगम साधल्यास विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत निश्चितच वाढ होईल असे मत त्यांनी व्यक्त केले.
ही कार्यशाळा दोन दिवस चालणार असून त्यामध्ये ई-कन्टेन्ट डिझाईन, व्हिडिओ लेक्चर निर्मिती,AI चा वापर करत वैयक्तिक अध्यापन इत्यादी विषयावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या कार्यशाळेत विविध महाविद्यालयातील प्राध्यापक,शिक्षक व संशोधक विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले असून कार्यशाळेबाबत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. ही कार्यशाळा अर्थशास्त्र, इंग्रजी आणि हिंदी विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आली आहे.
उद्घाटन कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.जोगन मोरे यांनी केले.सूत्रसंचालन प्रा.डॉ. आनंत शिंदे यांनी केले तर आभार प्रा.डॉ.शिवहार साळुंके यांनी मानले. या कार्यक्रमासाठी विविध महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक व संशोधक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
